महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेल येथील आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने ‘बिल्व दिन’ साजरा करण्यात आला.
नवीन पनवेल (प्रतिनिधी)
महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेल येथील आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने ‘बिल्व दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी पेण, पनवेल, गोंदिया, रत्नागिरी, बोईसर, डहाणू, अलिबाग, उरण येथे बेलाची रोपे वाटप व बेलाची रोपे लावण्यात आली.सदर कार्यक्रमात बेलाच्या औषधी गुणधर्माची माहिती असलेलीे पत्रकेही वाटप करण्यात आली.आर्या वनौषधींच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर लिमये,आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक नरेंद्र लिमये,पत्रकार दत्तू कोल्हे, आर्या वनौषधी संस्थेचे सुधीर पाटील,विनोदकुमार जांभूळकर आदींचा मोलाचा सहभाग होता.
बिल्व दिना निमित्ताने यावेळी ‘महाशिवरात्र व आयुर्वेद’ हा विशेष कार्यक्रमही घेण्यात आला.महाशिवरात्रीला भगवान शंकराला वाहणाऱ्या बिल्वदल, कवठ,बिल्व फळ,धोत्रा फुल,धोत्रा फळ,आंबा मोहर,पळस फुले आदी पत्री वाहली जाते .या पाना- फुलांच्या पत्रीच्या औषधी गुणधर्माची माहिती यावेळी आर्या वनौषधी संस्थेचे सुधीर पाटील यांनी दिली.बेला मध्ये असलेले अनेक गुण पाहून त्याचा समाविष्ट ऋषिमुनींनी ईश्वर पूजेकरिता केला.देवाला वाहण्याच्या निमित्ताने या वनस्पती सहज हाताळल्या जाऊन त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची, उपयोगाची सहज व नकळत माहिती मिळावी हाच उद्देश त्यामागचा असावा असेही वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.