महावितरणच्या वीजबिल दुरुस्ती शिबीराला अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील कृषी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद.
महावितरणच्या वीजबिल दुरुस्ती शिबीराला अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील कृषी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद
एकूण ४१० कृषी ग्राहक सहभागी , त्यातील १४३ ग्राहकांकडून ३,०६,४७७ रुपयांचा वीजबिल भरणा
मुंबई, दि. १६ मार्च २०२२:
सध्या महावितरणच्या विविध परिमंडलात कृषी ग्राहकांसाठी वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडळांतर्गत अलिबाग, कर्जत-खालापूर तसेच श्रीवर्धन येथे सदर शिबीर नुकतेच घेण्यात आले असून या शिबिराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठया संख्येने कृषी ग्राहकांनी उपस्थित राहून वीज देयकाची दुरुस्ती करुन घेतली आहे. सदर कार्यक्रम भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर व अधीक्षक अभियंता, पेण मंडल श्री इब्राहीम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून कार्यकारी अभियंता, गणेश पाचपोहे व कार्यकारी अभियंता .श्री. शिवाजी वायफळकर व प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. चांदपाशा इनामदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
महावितरण मधील कृषी ग्राहकांची थकबाकी वाढत चाललेली असून त्यांच्या हितासाठी महावितरणने ‘कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० ‘ जाहीर केले होते. परंतु, या धोरणाला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी चुकीच्या देयकांचा मुद्दा वारंवार लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी व ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे . या अनुषंगाने मुख्य कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे, भांडूप परिमंडल अंतर्गत अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्तीसाठी अनुक्रमे दि. ११ मार्च, १२ मार्च व १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ग्राहकांच्या मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी इत्यादी स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यात आले.
अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील शिबिरांत एकूण ४१३ कृषी ग्राहक सहभागी झाले होते. यापैकी १९६ ग्राहकांच्या विजबीलाबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. २४९ ग्राहकांचे वीज बिल दुरुस्त करण्यात आले. एकूण १४३ ग्राहकांनी ३,०६,४७७ रुपयांचा वीज बिल भरणा केला. १७२ ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक अद्ययावत केला. १५८ ग्राहकांनी आपल्या वीजमीटर बाबत तक्रारी दाखल केल्या.
“महावितरणची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली असून त्यात कृषी ग्राहकांचा एक मोठा वाटा आहे. महावितरण आपल्या वीजबिलाची थकबाकी भरण्याची अनेक संधी देत आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी आपले चालू व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे”, असे आवाहन भांडूप परीमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुरेश गणेशकर यांनी कृषी ग्राहकांना केले आहे.